मुंबई सांगली जिल्ह्यातील विटा शहरात सोमवारी पहाटे तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीर भाजले असून, त्यांना सांगली येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील एका तीन मजली इमारतीला सकाळी भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सोमवारी दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीत अडकलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना बाहेर काढले. यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. विष्णू जोशी (47), सुनंदा विष्णू जोशी (42), प्रियांका योगेश इंगळे (25) आणि सुस्ती इंगळे (2) अशी मृतांची नावे आहेत. दोघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.