मुंबई महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड घाटात काल रात्री कारचे नियंत्रण सुटून रेलिंगला धडकून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. या घटनेतील सर्व जखमींवर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचा तपास करत असलेले सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी गुरुवारी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथून सात जण जात होते. बुधवारी रात्री त्यांची कार कन्नड घाटाजवळ आली असता अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात कार घाटाच्या रेलिंगला जाऊन धडकली.
ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून कारमधील सर्व जखमींना तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
तुकाराम रामभाऊ अंभोरे (27), शेखर रमेश दुरपते (31) आणि घनशाम रामहरी पिसोटे (30) यांना रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंभीर जखमी योगेश सोनवणे, अक्षय गिरे आणि ज्ञानेश्वर मोडे यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, तर तुषार घुगे यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.